Header Ads

Loknyay Marathi

परीक्षा पे चर्चा: पंतप्रधान नरेंद्र मोदी

परीक्षा पे चर्चा: तंत्रज्ञानाचे गुलाम व्हायचे नाही!

नवी दिल्ली: 'वीज-पाण्याचा योग्य उपयोग करणे, तसेच घरातील इतर व्यवस्थांचा योग्य प्रकारे उपयोग करणे ही देखील देशभक्ती आहे, आपण मेक इन इंडियाच्या वस्तू खरेदी केल्या तर त्याचा फायदा देशाला होतो. ते आपले कर्तव्यही आहे. आपल्याला आपले कर्तव्य योग्य प्रकारे पार पाडले पाहिजे', अशा शब्दांत देशभक्तीचा मंत्र देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ' परीक्षा पे चर्चा' या कार्याक्रमात दिल्लीतील तालकटोरा इनडोअर स्टेडियम येथे विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थी आणि माझा संवाद 'हॅशटॅग विदाउट फिल्टर' अशा स्वरुपाचा असल्याचे म्हणत मोदींनी नव्या पिढीशी स्वत:ला जोडण्याचा प्रयत्न केला.

इयत्ता १० वी आणि १२वीच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासाव्यतिरिक्त आवांतर गोष्टींसाठीही काही वेळ द्यायला हवा. त्यांनी केवळ अभ्यासावरच तेवढे लक्ष केंद्रित करू नये. आपले माइंड फ्रेश करण्यासाठी काही वेगळेही करण्याची आवश्यकता असल्याचे मोदी या कार्यक्रमात म्हणाले.

आवडीच्या क्षेत्रात मुलांना प्रगती करण्यासाठी प्रोत्साहन द्या, मोदींचं पालकांना आवाहन:
मुलं मोठी झाली आहेत, याचा स्वीकार करा, मुलं दोन-तीन वर्षांची असताना त्यांना मदत करण्याची जी भावना होती, ती कायम ठेवा, मुलांना आवडीच्या क्षेत्रात प्रगती करण्यासाठी प्रोत्साहित करा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पालकांना केलं आहे. अनेकदा आई-वडील आपल्या मुलांवर अभ्यासाप्रमाणे इतर एक्स्ट्रा अॅक्टिव्हीटीज करण्यासाठी दबाव टाकत असतात. मात्र आई-वडिलांनी असे करणे योग्य नव्हे. मुलांना रुची कशात आहे हे ओळखून त्यांनी मुलांना प्रोत्साहित करण्याची गरज असल्याचे मोदी म्हणाले.

'स्मार्टफोन तुमची वेळ चोरतो, मात्र...'
मला तंत्रज्ञान आवडते. मला त्याबद्दल अधिकाधिक जाणून घेण्याची उत्सुकता असते. तंत्रज्ञानाचा उपयोग करून शिकता येते. तुम्ही तुमच्या मोबाइलद्वारे रोज १० शब्द नोट करा, ते शिका. आज व्हॉट्सअँप सोशल नेटवर्किंग करत आहे. आम्ही तंत्रज्ञानाच्या द्वारे मित्रांना शुभेच्छा देतो. मात्र असे करत असताना आपल्याला तंत्रज्ञानाचे गुलाम व्हायचे नाही. तंत्रज्ञानाबाबत नक्कीच जाणून घेत राहा, मात्र, त्याचा दुरुपयोग कधीही करू नका, असा कानमंत्रही मोदींनी मुलांना दिला.