दुर्दम्य इच्छाशक्तीच्या पाठीशी, डॉ. पतंगराव कदम शिष्यवृत्ती: डॉ. आर. बी. कुलकर्णी
दुर्दम्य इच्छाशक्तीच्या पाठीशी, डॉ. पतंगराव कदम शिष्यवृत्ती: डॉ. आर. बी. कुलकर्णी
( डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात ‘शिष्यवृत्ती प्रदान समारंभ’ उत्साहात)
सांगली : भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय, सांगली येथे ‘डॉ. पतंगराव कदम गुणवत्ता शिष्यवृत्ती’ प्रदान समारंभ उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात भारती विद्यापीठ गीत व प्रार्थनेने झाली.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मेडिकल सायन्सेस गोल्ड मेडल विजेते (१९८७) डॉ. आर. बी. कुलकर्णी (विद्यमान अकॅडमिक डायरेक्टर, भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज, सांगली; माजी अधिष्ठाता, फॅकल्टी ऑफ मेडिकल सायन्सेस) हे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. व्ही. ए. रणखांबे होते. उपप्राचार्य डॉ. अमित सुपले, कनिष्ठ विभागप्रमुख प्रा. ए. एल. जाधव, शारीरिक शिक्षण संचालक डॉ. अमर तुपे, शिष्यवृत्ती समन्वयक डॉ. एन. डी. पवार, परीक्षा विभागप्रमुख प्रा. ए. ए. कुंभार तसेच व्यवसाय शिक्षण विभागप्रमुख डॉ. आनंदा सपकाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते भारती विद्यापीठाचे संस्थापक कुलपती डॉ. पतंगराव कदम साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
मा. कार्यवाह डॉ. विश्वजीत कदम यांनी साहेबांच्या स्मृती प्रित्यर्थ गुणवंत विद्यार्थ्यांच्यासाठी ही योजना सुरू केली आहे. भारती विद्यापीठाच्या कॉलेजेस मध्ये, वर्गात गुणानुक्रमे येणारे पहिले दोन विद्यार्थी, तसेच विशेष गुणवत्ता धारक विद्यार्थी आणि कला, क्रीडा, सांस्कृतिक आणि युपीएससी/एमपीएससी क्षेत्रात , तसेच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील उल्लेखनीय यश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्याना ही विशेष शिष्यवृत्ती प्रदान केली जाते.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. आर. बी. कुलकर्णी यांनी आपल्या भाषणात, “डॉ. पतंगराव कदम शिष्यवृत्ती ही केवळ आर्थिक मदत नसून विद्यार्थ्यांमध्ये ध्येयप्रवणता हा संस्कार रुजवणारी योजना आहे, असे प्रतिपादन केले. ही योजना राबवणारे भारती विद्यापीठातील पहिले महाविद्यालय म्हणून डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय सांगली हे प्रथम स्थानावर आहे, या बद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी ध्येयप्रवण वृत्तीने, आव्हाने झेलीत, मूल्याधिष्ठित जगावे, अपमान झेलावेत आणि परिस्थिती बद्दल तक्रार न करता, स्वतःहून संधींचे अवकाश निर्माण करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. व्ही. ए. रणखांबे आपल्या मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, मा. कार्यवाह यांच्या मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठाने गुणवंत विद्यार्थ्यांसाठी घेतलेला हा शिष्यवृत्तीचा निर्णय हा एक महत्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय आहे.
भारती विद्यापीठाचे संस्थापक डॉ. पतंगराव कदम यांच्या नावाने सुरू असलेली ही शिष्यवृत्ती योजना संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशात आदर्शवत ठरेल असे प्रतिपादन पालकप्रतिनिधीनी या वेळी केले.
समारंभात एकूण ५४ गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करून त्यांना धनादेश स्वरुपात आणि प्रमाणपत्र देऊन शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.
या कार्यक्रमाचे स्वागत उपप्राचार्य डॉ. अमित सुपले यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.भारती भावीकट्टी यांनी केले. तर आभार प्रदर्शन समन्वयक डॉ. एन.डी.पवार यांनी मानले.
या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व शिष्यवृत्ती मिळालेली विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)







Post a Comment