Header Ads

Loknyay Marathi

ज्येष्ठ साहित्यिक : उत्तम बंडू तुपे

ज्येष्ठ साहित्यिक उत्तम बंडू तुपे काळाच्या पडद्याआड

पुण्यातील शिवाजीनगर (मुळा रोड) येथे राहणारे ज्येष्ठ साहित्यिक उत्तम बंडू तुपे यांचे दुःखद निधन झाले.

सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील एका छोट्या जन्मगाव असलेल्या खेड्यात तुपे यांचे दुष्काळामुळे पोट भरणे शक्यच नव्हते. त्या दुष्काळी परिस्थितीत सापडून ते पुणेकर झाले. आपल्या बहिणीचा आधार त्यांनी घेतला. पुढे त्यांना वामनराव देशपांडे भेटले. तेथे त्यांनी अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य मनःपूर्वक वाचले. तो प्रभाव त्यांच्यावर पडला आणि त्यांच्यामधले लेखन बीज अंकुरले. आपल्या आत्याच्या आश्रयाने ते पुण्यात कसेबसे जगले. पडेल ती कामे पत्करली. हातावरची मोल मजुरी करून दिवस काढले. दुर्गंधीयुक्त झोपडपट्टीत हा प्रतिभावंतलेखक वाढला. त्याला योगायोगाने जिवाभावाची मानलेली मीनाताई बहीण भेटली. अनेकानेक कटु अनुभवांना सामोरे जावे लागले. छ्बीसारखी सख्खी बहीण पण तिनेही पैशासाठी भावाला नाडले. शाळेत खोटारडे बसीन मास्तर यांनी जातीयवादी, माणुसकीला काळिमा फासणारी वागणूक दिली. पण शेवटी उत्तम बंडू तुपे या साऱ्यांवर मात करून थोर साहित्यिक झाले.

अल्पशिक्षित असूनही उत्तम बंडू तुपे यांनी मराठीमध्ये विपुल लेखन केले आहे. कादंबरी, लघुकथा, नाटक आणि आत्मकथन या प्रकारांत त्यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. ‘काट्यावरची पोटं’ हे त्यांचे आत्मचरित्र आहे. अत्यंत प्रामाणिकपणे त्यांनी ते लिहिले आहे. उपेक्षित, वंचित समाजाच्या वेदना-व्यथा त्यात चित्रित झाल्या आहेत. त्या चित्रणात वास्तवता आहे, सचोटीची अनुभूती आहे मातंग समाजाचे दुखणे मांडलेले आहे; जीवन संघर्षाचे वर्णन आले आहे. या आत्मचरित्रात सामाजिक स्थितीचे विदारक दर्शन घडत असल्याने आजवरच्या दलित आत्मकथनांत त्याचे स्थान अव्वल दर्जाचे म्हणावे लागेल.

तुपे यांची साहित्यसंपदा
आंदण (१९८४), कोबारा (१९९१), माती आणि माणसे (१९९३), पिंड (१९९५) हे त्यांचे कथासंग्रह लागोपाठ प्रसिद्ध झाले. या कथांत त्यांनी बारा बलुतेदारांच्या खडतर, कष्टाळू जीवनाचे चित्र रेखाटले आहे. अण्णाभाऊ साठे, शंकरराव खरात, बंधुमाधव, बाबुराव बागुल, केशव मेश्राम हे त्यांच्या अगोदरचे प्रस्थापित दलित कथाकार होते. अंधश्रद्धा, अनिष्ट प्रथा, स्त्रियांची दुःखे, असे ग्रामीण वातावरण तुपे यांनी चितारले आहे. या स्थितीला जबाबदार असणाऱ्याना त्यांनी दूषणे दिली आहेत. त्यांच्या या कथा गोरगरिबांच्या वेदनांना वाचा फोडणाऱ्या झाल्या आहेत. त्यांत अठराविश्व दारिद्‌ऱ्याचे दर्शन आहे. शेतकरी, कष्टकरी वर्गाच्या वास्तवाला धरून असलेल्या या कथा आहेत म्हणून त्या हृदयस्पर्शी व वाचनीय झाल्या आहेत. त्यांचे व्यक्तिचित्रण खरोखरच मार्मिक आहे.

तुपे यांची झुलवा ही विशेष गाजलेली कादंबरी, नाटकात रुपांतरित झाली आहे. ‘मला येगळ्या वाटंनं जायाचंय्‌, ही मळल्याली वाट सोडून चालायचंय्‌-’ म्हणणाऱ्या, यल्लम्माच्या कीर्तीचा बाजार मांडणाऱ्या खोट्या दुनियेविरूद्ध प्राण पणाला लावून बंड करणाऱ्या जगन जोगतिणीची ही गोष्ट वाचकाला अंतर्मुख करते. या कादंबरीवरून चेतन दातार यांनी झुलवा नावाचे नाटक लिहिले. दिग्दर्शक व निर्माते वामन केंद्रे होते.

तुपे यांच्या कादंबऱ्या भटक्या विमुक्तांचे जीवन चित्रित करणाऱ्या, दलित स्त्रियांचे प्रश्न मांडणाऱ्या, खेड्यातल्या जीवनातील दाहकतेचा प्रत्यय आणून देणाऱ्या आहेत. संतू, लांबलेल्या सावल्या मधील माधव, चिपाड मधील सुशिक्षित बेकार, शेवंती, खुळी, खाई मधील सावरी, ईजाळमधील शामा, झुलवातील जोगतीण, झावळ मधला काशिनाथ कोळी या व्यक्तिरेखांवरून याची कल्पना येते.

उत्तम बंडू तुपे यांनी लिहिलेली पुस्तके
आंदण (लघुकथा संग्रह)
इजाळ (कादंबरी)
काट्यावरची पोटं (आत्मचरित्र)
कोबारा (लघुकथा संग्रह)
खाई (कादंबरी)
खुळी (कादंबरी)
चिपाड (कादंबरी)
झावळ (कादंबरी)
झुलवा (कादंबरी)
पिंड (लघुकथा संग्रह)
भस्म (कादंबरी)
माती आणि माणसं (लघुकथा संग्रह)
लांबलेल्या सावल्या (कादंबरी)
शेवंती(कादंबरी)
संतू (कादंबरी)

उत्तम बंडू तुपे यांना भावपूर्ण आदरांजली...