Header Ads

Loknyay Marathi

गणेश मंदिर - सांगली नगरीचे आराध्य दैवत..!


सांगली संस्थांचे पहिले अधिपती चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन यांनी कृष्णा नदीकाठी १८१४ मध्ये गणेश मंदिराची उभारणी सुरू केली. ती पुढे तीस वर्षे सुरू होती, असे सांगितले जाते. मुख्य मंदिर काळ्या पाषाणातील असून पेशवेकालीन वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून याकडे पाहिले जाते.कृष्णातीरावरील गणेश मंदिर तब्बल दोन शतके सांगलीकरांच्या सुख-दु:खाचा साक्षीदार आहे. या संस्थानकालीन मंदिराचे सौंदर्य लुभावणारे आहे. दगडी स्थापत्याचा उत्कृष्ट नमुना म्हणून इतिहास अभ्यासकांना आकर्षित करणारे हे मंदिर वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे प्रसिद्ध आहे.

मिरज संस्थानचे अधिपती सरदार गंगाधरराव पटवर्धन आणि सांगलीचे पहिले अधिपती चिंतामणराव पटवर्धन यांच्यात १७९९ मध्ये सरंजामाच्या वाटणीवरून विवाद निर्माण होऊन वाटणी झाली. चिंतामणराव पटवर्धन यांनी मिरजेच्या किल्ल्यातून बाहेर पडून सांगलीला आपल्या संस्थानाची राजधानी बनविली होती. त्यांनी सांगलीला गणेशदुर्ग या भुईकोटाची उभारणी केली.चिंतामणराव पटवर्धन यांची गणेशावर नितांत श्रद्धा होती. यामुळे त्यांनी कृष्णा नदीच्या काठाला १८१४ मध्ये गणेश मंदिराची उभारणी सुरू केली. प्रवेशद्वाराला लाल दगड वापरला तर मुख्य गाभारा आणि पंचायतनच्या मंदिरासाठी काळा घडीव दगड वापरला. या मंदिराच्या उभारणीस तब्बल ३० वर्षांचा कालावधी लागल्याचे समजते. शेकडो मजूर रात्रंदिवस या मंदिराच्या उभारणीच्या कामासाठी कष्ट करीत होते.

मंदिरातील पंचायतनच्या पाच मूर्ती भिमण्णा आणि मुकुंदा पाथरवट या स्थानिक कारागिरांकडून बनवून घेण्यात आल्या. यानंतर दोन वर्षांनी म्हणजे १८४७ मध्ये मंदिराच्या शिखराचे काम पूर्ण करण्यात आले. १८४७ मधील मार्गशीर्ष महिन्यात मंदिराचा कलशारोहण समारंभ मोठय़ा थाटामाटात साजरा करण्यात आला. याच गणेशाच्या नावाने सांगलीची बाजारपेठ वसली. १९५२ मध्ये या गणेश मंदिरासमोर लाल रंगातील दगडाची कमान उभारण्यात आली. दुसऱ्या चिंतामणरावांच्या काळात या मंदिराची उर्वरित कामे पूर्ण करण्यात आली.मुख्य मंदिर काळ्या पाषाणातील असून पेशवेकालीन वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून याकडे पाहिले जाते. मंदिरात संगमरवरातील रिद्धी-सिद्धीसह असलेल्या गणेशाची मूर्ती सुबक आहे. मुख्य मंदिराभोवती चिंतामणेश्वर हे महादेवाचे, चिंतामणेश्वरी हे देवीचे, सूर्यनारायण आणि लक्ष्मीनारायण अशी चार मंदिरे आहेत. या चार व एक मुख्य मंदिर असे गणपती पंचायतन म्हणून ओळखले जाते.

दरवर्षी भाद्रपद महिन्यात पाच दिवस गणेशोत्सव येथे साजरा केला जातो. या काळात कीर्तन, प्रवचन, ललित असे कार्यक्रम संस्थानकाळात आयोजित करण्यात येत होते. याशिवाय नामांकित हरदास, गवई अणि नृत्यांगनांचे कार्यक्रमही आयोजित करण्यात येत होते.अलीकडच्या काळात विजयसिंह पटवर्धन यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार करून कायापालट केला आहे. मंदिराचे सुशोभीकरण करण्यात आले असले तरी मंदिराची मूळची सजावट कायम ठेवण्यात आली आहे. गणेशोत्सवालाही शाही रुपडे देण्यात आले आहे. उत्सवासाठी शाही परिवार अगत्याने उपस्थित असतो. अगदी चित्रपट तारका भाग्यश्री पटवर्धनही या उत्सवाला आवर्जून हजेरी लावून गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होतात.

गणेशदुर्गातील दरबार हॉलमध्येही गणेशाची स्थापना करण्यात येते. ही प्रथा गेल्या २०० वर्षांपासून जपण्यात आली असून हा उत्सव पाहण्यासाठी आसपासच्या गावांसह लांबून लोक येतात.गणेश मंदिराची उभारणी केल्यानंतर चिंतामणरावांनी भाद्रपद शुद्ध प्रतिपदेपासून उत्सव सुरू केला. या उत्सवासाठी लाकूड, भुसा आणि कागदाचा लगदा वापरून गणेशमूर्ती तयार करण्यात येते. याला अलीकडील काळात चोर गणपती असे म्हटले जात असले तरी तसा ऐतिहासिक कागदपत्रांत संदर्भ सापडत नाही.मंदिरातील गणेश उत्सवाची सांगता पंचमीला होते, मात्र राजवाडय़ातील दरबार हॉलमधील गणेश विसर्जन भाद्रपद अष्टमीला होते. या विसर्जन मिरवणुकीत अग्रभागी बबलू हत्ती असायचा. आजही त्याच दिमाखात मिरवणूक निघत असली तरी बबलूशिवाय असते. या मिरवणुकीवर गणेशभक्तांकडून पेढय़ांची उधळण होत असते.

(Ganesh Temple - Sangli)