Header Ads

Loknyay Marathi

महाराणी अहिल्याबाई होळकर

महाराणी अहिल्याबाई होळकर (Ahilyabai Holkar)


अहिल्याबाई होळकर या केवळ एक महान शासकच नव्हे तर पराक्रमी योद्धा आणि सर्वश्रुत अश्या धनुर्धर देखील होत्या. अनेक युद्धांमध्ये साहसी योध्याप्रमाणे विचारपूर्वक निर्णय घेत त्यांनी युद्धाचे नेतृत्व केले आणि विजय संपादन केला. शिवाय अहिल्याबाई अश्या शासकांमधून एक होत्या ज्या आपल्या प्रांताच्या रक्षणार्थ व अन्याया विरुद्ध आक्रमण करण्यास कधीही मागेपुढे पाहत नसत.

महाराणी अहिल्याबाईंची ओळख मावळ प्रांताच्या राजमाता म्हणून होती, त्यांच्यातील अद्भुत साहसाला आणि अदम्य प्रतिभेला पाहून मोठ-मोठे राजे आणि प्रभावशाली शासक देखील आश्चर्यचकित होत असत. अहिल्याबाई महिलांच्या सशक्तीकरणाच्या बाजूने होत्या. स्त्रियांची परिस्थिती बदलण्या करता त्यांनी बरेच प्रयत्न केलेत.

विधवा स्त्रियांना त्यांचा हक्क मिळण्याकरता अहिल्याबाईंनी कायद्यात बदल करत विधवा महिलांना त्यांच्या पतीच्या संपत्तीत अधिकार मिळवून दिला व मुल दत्तक घेण्याचा हक्क देखील प्राप्त करून दिला. अहिल्याबाईंचे हृदय दया, परोपकार, निष्ठा या भावनांनी ओतप्रोत भरलेले होते, म्हणूनच करुणेची देवी…कुशल समाजसेविका…या प्रतिमेने त्यांना ओळखलं जात होतं.

अहिल्याबाई होळकर याचं प्रारंभिक जीवन आणि शिक्षण – 

कुशल शूरवीर मराठा प्रांताच्या महाराणी अहिल्याबाई होळकर यांचा जन्म 31 मे 1725 ला महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात जामखेड नजीकच्या चौंडी गावी झाला.

अहिल्याबाई या चौंडी गावचे पाटील माणकोजी शिंदे आणि सुशीलाबाई यांची लाडकी कन्या! अहिल्याबाईंचे वडील पुढारलेल्या विचारधारेला मानणारे होते त्यांच्या वाटायचं की महिलांनी शिक्षित व्हायला हवं. ज्या काळात महिलांना घराचा उंबरा देखील ओलांडण्याची परवानगी नव्हती त्या काळात माणकोजी शिंदेनी आपल्या अहिल्येला शिक्षणाची गोडी लावली.

अहिल्याबाईंचे बरेचसे शिक्षण आपल्या वडिलांकडेच झाले. बालपणापासून अहिल्याबाई विलक्षण प्रतिभेच्या धनी होत्या, कोणताही विषय त्यांना फार लवकर अवगत होत असे. पुढे आपल्यातील अद्भुत साहस आणि विलक्षण प्रतिभेने त्यांनी सगळ्यांनाच अवाक् करून सोडले… अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आणि कठीण संघर्षाच्या काळात देखील विचलित न होता त्यांनी आपलं लक्ष्य प्राप्त केलं. पुढे अवघ्या विश्वाकरता त्या एक आदर्श ठरल्या.

अहिल्याबाई होळकर यांचा विवाह आणि अपत्ये – 
बालपणापासून अहिल्याबाईंच्यात दया, परोपकार, प्रेम, सेवाभाव या भावना उपजतच होत्या. लहानपणी भुकेलेल्यांना अन्न भरवत असतांना छोट्याश्या अहिल्येला पुण्याला जात असलेले मावळ प्रांताचे शासक मल्हारराव होळकर यांनी पाहीलं. त्यावेळी ते चौंडी येथे विश्राम करण्याकरता थांबले होते.

बालवयातच अहिल्याबाईंमधील दया प्रेम आणि गरजूंकरीता असलेली करुणा पाहून मल्हारराव होळकर एवढे प्रभावित झाले कि त्यांनी त्वरित माणकोजी शिन्देंकडे आपला पुत्र खंडेराव होळकर यांच्यासाठी अहिल्येला मागणी घातली. त्यानंतर 1733 साली वयाच्या अवघ्या 8 व्या वर्षी अहिल्याबाईंचा विवाह मल्हारराव होळकर चा पुत्र खंडेराव होळकर यांच्याशी संपन्न झाला. आणि अश्या तऱ्हेने बालवयातच अहिल्याबाई मराठा साम्राज्यातील प्रसिद्ध अश्या होळकर कुटुंबाच्या सुनबाई झाल्या.

लग्नानंतर काही वर्षांनी म्हणजे 1745 साली अहिल्याबाईंना पुत्रप्राप्ती झाली, त्याचे नाव मालेराव. पुढे तीन वर्षांनी म्हणजे 1748 ला मुक्ताबाई नावाची सुंदर कन्या झाली. अहिल्याबाई राज्यकारभारात आपल्या पतीला मदत करीत असत, शिवाय त्यांच्यातील युद्ध आणि सैन्य कौशल्य उत्कृष्ट होण्यासाठी त्यांना सतत प्रोत्साहित देखील करीत असत. खंडेराव स्वतः उत्तम युद्धनिपुण होते. वडिलांच्या नेतृत्वात त्यांनी युद्धाचे कौशल्य प्राप्त केले होते.

अहिल्याबाई होळकर यांच्या व्यक्तिमत्वातील एवढ्या गुणांमागे त्यांचे सासरे मल्हारराव होळकर यांचा सिंहाचा वाटा होता. वेळोवेळी मल्हाररावांनी आपल्या सूनबाईंना सैन्य, राज्यकारभार यांचं शिक्षण दिलं. अहिल्याबाईंमधील अद्भुत प्रतिभा पाहून मल्हारराव खूप समाधानी होत असत.

महाराणी अहिल्याबाईंच्या जीवनातील संघर्ष आणि अडचणी –
अहिल्याबाईंचं आयुष्य सुखासमाधानाने व्यतीत होत असतानांच अचानक त्यांच्यावर दुखःचा डोंगर कोसळला. 1754 साली जेंव्हा अहिल्याबाई फक्त 21 वर्षांच्या होत्या, त्यावेळी त्यांच्या पतीला खंडेराव होळकरांना कुंभेर येथील युद्धात वीरमरण प्राप्त झाले.

इतिहासकारांच्या मते आपल्या पतीवर अत्यंत प्रेम करणाऱ्या अहिल्याबाईंनी पतीनिधनानंतर सती जाण्याचा निर्णय घेतला, परंतु त्यांचे सासरे मल्हारराव होळकरांनी त्यांना असे करण्यापासून रोखले. पुढे 1766 साली मल्हारराव होळकरांचे देखील निधन झाले.

अहिल्याबाईंना अतिशय दुखः झाले, तरीदेखील निराश न होता पुढे मावळ प्रांताची जवाबदारी अहिल्याबाईंच्या नेतृत्वात त्यांचे चिरंजीव मालेराव होळकर यांनी आपल्या हातात घेतली. राज्यकारभाराची सूत्र हाती घेतल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्ये 1767 साली मालेरावांचा देखील मृत्यू झाला.

अहिल्याबाईंवर आभाळ कोसळलं. पती, तरुण मुलगा, वडिलांप्रमाणे असलेले सासरे यांच्या मृत्यूपश्चात अहिल्याबाईंनी ज्या पद्धतीनं राज्यकारभार सांभाळला ते केवळ कौतुकास्पदच नव्हे तर आदर्श घेण्यासारखेच आहे.

एक महान योद्धा…कुशल राजनीतिज्ञ…आणि प्रभावशाली शासक महाराणी अहिल्याबाई:
आयुष्यात दुःखाचा डोंगर कोसळल्या नंतर देखील अहिल्याबाईंनी धीर खचू दिला नाही. वैयक्तिक दुःखाचा प्रभाव त्यांनी प्रजेवर पडू दिला नाही. पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे ढासळणाऱ्या आपल्या मावळ प्रांताला पाहून त्यांनी स्वतः उत्तराधिकारी होण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी पेशव्यांच्या पुढे विनंती केली.

11 डिसेंबर 1767 रोजी त्यांनी मावळ प्रांताची सूत्र आपल्या हाती घेतली. अहिल्याबाईंनी राज्याची सूत्र हाती घेतल्यानंतर राज्यातील बऱ्याचलोकांनी याचा विरोध देखील केला. परंतु हळू-हळू त्यांच्यातील अद्भुत शक्ती आणि पराक्रमाला पाहता प्रजा त्यांच्या कार्यावर विश्वास ठेवू लागली.

इतिहासातील सर्वात पराक्रमी आणि कुशल योद्धा महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी माळवा प्रांताची सूत्र हाती घेतल्यावर मल्हाररावांचे दत्तक पुत्र आणि सगळ्यात विश्वासू सुभेदार तुकोजीराव होळकर यांना सैन्याचा प्रधान सेनापती म्हणून नियुक्त केलं. आपल्या कार्यकाळात अहिल्याबाईंनी अनेकदा युद्धात प्रभावशाली रणनीती आखत सैन्याचे कुशल नेतृत्व केले.

आपल्या प्रजेच्या रक्षणार्थ अहिल्याबाई सतत तत्पर रहात असत. युद्ध प्रसंगी हत्तीवर स्वार होऊन अहिल्याबाई पराक्रमी योध्याप्रमाणे शत्रूवर बाण चालवीत असत. ज्या सुमारास अहिल्याबाईंनी मावळ प्रांताची सूत्र आपल्या हातात घेतली त्यावेळी प्रांतात अशांततेचं वातावरण पसरलं होतं.

राज्यात मोठ्या प्रमाणात चोरी, लुट, हत्या, या घटनांमध्ये वाढ झाली होती. यावर अंकुश आणण्यात अहिल्याबाईं यशस्वी झाल्या. आणि आपल्या नेतृत्वात त्यांना प्रांतात शांतता आणि सुरक्षेचं वातावरण स्थापन करण्यात यश आलं. पुढे त्यांच्या राज्याचा कला, व्यवसाय, शिक्षण, या क्षेत्रात उत्तम विकास झाला.

कालांतराने अहिल्याबाईंच्या शौर्य आणि साहसाची चर्चा अवघ्या विश्वात होऊ लागली. त्या एक दुरदृष्टीकोन बाळगणाऱ्या शासक होत्या, आपल्यातील नैपुण्याने त्या शत्रूचा हेतू ओळखून घेत असत. ज्या सुमारास पेशव्यांना एका प्रकरणात इंग्रजांचा दृष्टं हेतू लक्षात आला नाही त्यावेळी अहिल्याबाईंनी पुढे होत पेशव्यांना त्याविषयी अवगत केले होते. महान शासक अहिल्याबाईंनी आपल्या राज्याच्या विस्ताराकरता अनेक चांगली कामं केलीत.

आपल्या राज्याचा विकास व्यवस्थित होण्याच्या उद्देशाने त्यांनी राज्याला वेगवेगळे  तालुके आणि जिल्ह्यांमध्ये विभागले. ग्रामपंचायतीचे काम सुरळीत करून न्यायालयांची स्थापना केली. अहिल्याबाईंची गणना आता आदर्श शासकाच्या रुपात सर्वदूर होऊ लागली होती.

महाराणी अहिल्याबाई यांची विकास आणि निर्माण कार्य – 
अहिल्याबाई होळकर यांनी 18व्या शतकात इंदौर नजीक महेश्वर येथे नर्मदा नदीच्या किनाऱ्यावर एका भव्य, शानदार आणि आलिशान राजवाड्याची निर्मिती केली. त्या काळी साहित्य, संगीत, कला, आणि उद्योग क्षेत्रात महेश्वर ओळखले जात होते. मराठा प्रांताची महाराणी…पराक्रमी योद्धा अहिल्याबाई होळकर या कोणत्याही मोठ्या राज्याच्या शासक नव्हत्या तरीदेखील आपल्या शासनकाळात आपल्या साम्राज्याचा विस्तार करण्यात आणि त्याला समृद्ध बनविण्यासाठी अनेक विकासात्मक कामं केलीत.

अहिल्याबाईंनी अनेक धार्मिक आणि प्रसिद्ध तीर्थस्थळांचे निर्माणकार्य पूर्ण केले. या व्यतिरिक्त अहिल्याबाईंनी मोठ्या कौशल्याने आणि कुशाग्रतेने अनेक किल्ले, विश्रामगृह, विहिरी, आणि रस्त्यांची निर्मिती केली. इतकेच नव्हे तर शिक्षणाचा प्रचार-प्रसार केला शिवाय कला-कौशल्य क्षेत्रात सुद्धा आपले अभूतपूर्व योगदान दिले. राणी अहिल्याबाईंनी केवळ आपल्या प्रांतातच नव्हे तर संपूर्ण भारतभर वेगवेगळ्या ठिकाणी धार्मिक मंदिरांची, धर्मशाळांची, निर्मिती केली.

द्वारका, रामेश्वरम, बद्रीनारायण, सोमनाथ, अयोध्या, जगन्नाथ पुरी, काशी, गया, मथुरा, हरिद्वार, सारख्या अनेक मंदिरांचा अहिल्याबाईंनी जीर्णोद्धार केला व त्या ठिकाणी अनेक धर्मशाळा उभारल्या. याशिवाय बनारस येथे अन्नपूर्णा मंदिर, गया येथे विष्णू मंदिर बनविले. अहिल्याबाई होळकरांनी आपल्या शासनकाळात कलकत्ता ते बनारस या रस्त्याची निर्मिती केली…अनेक विहिरींचे निर्माणकार्य केले…घाट बांधले…रस्ते-मार्ग बनविले.

अहिल्याबाई होळकर या दानशूर आणि उदार शासक होत्या, त्यांच्यात दया, करुणा, परोपकाराची भावना ओतप्रोत भरलेली होती आणि म्हणूनच आपल्या शासनकाळात गरिबांकरता व भुकेलेल्यांसाठी त्यांनी अनेक अन्नछत्र उघडलीत…पाण्याकरता अनेक पाणपोया स्थापन केल्या.

इंदौर शहराला सुंदर आणि समृद्ध बनविण्यात अहिल्याबाई होळकरांचे योगदान:
आपल्या 30 वर्षांच्या अद्भुत कार्यकाळात अहिल्याबाईंनी इंदौर या छोट्याश्या शहराला समृद्ध आणि विकासात्मक बनविण्यात आपले अमुल्य योगदान दिले आहे. येथील रस्त्यांची स्थिती, भुकेलेल्या जीवांसाठी अन्नछत्र, शिक्षण या संबंधी अद्वितीय कार्य करून ठेवलं आहे. त्यांच्यामुळेच आज इंदौर शहराची ओळख समृद्ध आणि विकसित शहरांमध्ये केली जाते.

विधवा महिला आणि समाजाकरता अहिल्याबाईंनी केलेली कार्य: अहिल्याबाईंची ओळख एक विनम्र आणि उदार शासक म्हणून सर्वदूर परिचित होती. गरजवंतांसाठी, गरीबांकरता, असहाय्य व्यक्तींसाठी त्यांच्या हृदयात करुणेचा सागर उफाळून येई. समाजसेवेचे व्रत अंगिकारलेल्या अहिल्याबाईंनी समाजाकरता स्वतःला पूर्णतः समर्पित केले होते. त्या कायम आपल्या प्रजेचे आणि समाजाचे भले होण्याचा विचार करीत असत आणि त्या दृष्टीकोनातून कार्यरत रहात असत.

त्यावेळेच्या विधवा महिलांसाठी त्यांनी चांगलं कार्य केलं. आणि त्यांच्यासाठी त्या वेळी बनविण्यात आलेल्या कायद्यात देखील बदल केला. त्या वेळच्या कायद्याप्रमाणे जर एखादी महिला विधवा झाली आणि तिला मुलबाळ नसेल तर तिची सगळी संपत्ती सरकारी खजिन्यात किंवा राजकोशात जमा होत असे. परंतु अहिल्याबाईंनी या कायद्यात बदल करून महिलांना आपल्या पतीच्या संपत्तीचे वारसदार बनविले. या व्यतिरिक्त त्यांनी महिलांच्या शिक्षणावर फार भर दिला.

आपल्या आयुष्यात आलेली अनेक संकटं पार करत अहिल्याबाईंनी ज्या पद्धतीने दुर्दम्य आशावादाने स्त्रीशक्तीचा वापर केला तो खूप प्रशंसनीय आहे. महिलांकरीता त्या कायम एक प्रेरणास्त्रोत होत्या आणि राहतील.

शिवाप्रती होती दृढ श्रद्धा आणि समर्पण-
महाराणी अहिल्याबाई होळकर यांची शिवावर अपार श्रद्धा आणि दृढ विश्वास होता. असं म्हणतात कि त्यांच्या स्वप्नात एकदा शिवाने दर्शन दिले होते. त्यानंतर 1777 साली त्यांनी संपूर्ण विश्वात प्रसिद्ध असलेल्या काशी विश्वनाथ मंदिराचा जीर्णोद्धार केला.

त्यांच्या शिवाप्रती असलेल्या निस्सीम भक्ती बद्दल असं देखील म्हंटल्या जातं की अहिल्याबाई राजाज्ञा देतांना स्वाक्षरी करतांना शिवाचे नाव लिहित असत. तेंव्हापासून स्वराज्य मिळेपर्यंत इंदौर येथे जेवढयाही राजांनी सत्ता सांभाळली… राजाज्ञा भगवान शंकराच्या नावानेच निघत राहीली.

अहिल्याबाईंना मिळालेला सन्मान – 
अहिल्याबाई होळकर यांनी समाजाकरता केलेल्या महान कार्याला पहाता त्यांच्या सन्मानार्थ भारत सरकारने 25 ऑगस्ट 1996 ला डाक तिकीट प्रकाशीत केले. याशिवाय अहिल्याबाईंच्या असाधारण आणि अद्वितीय कार्यासाठी त्यांच्या नावे एक पुरस्कार देखील दिला जाऊ लागला.

अहिल्याबाईंचा मृत्यू – 
आपल्या प्रजेच्या हितासाठी सतत कार्य करणाऱ्या आदर्श शासक अहिल्याबाई होळकर यांना 13 ऑगस्ट 1795 साली प्रकृती अस्वास्थ्यामुळे देवाज्ञा झाली. परंतु त्यांच्यातील उदारता… त्यांनी समाजाकरता केलेली असंख्य कार्य… यामुळे त्या आजही सगळ्यांच्या स्मरणात आहेत आणि यापुढेही राहतील.

आपल्या आयुष्यात आलेल्या असंख्य अडचणी… संघर्ष… याला तोंड देत त्या एकाकी झुंज देत लढत राहिल्या, कधीही परिस्थितीला शरण गेल्या नाहीत. आणि आपल्या लक्ष्याप्रती प्रामाणिक राहात पुढे जाट राहिल्या. प्रतिकूल परिस्थितीत देखील एका आईसारखा त्यांनी आपल्या प्रजेचा सांभाळ केला.

म्हणूनच त्यांना राजमाता आणि लोकमाता म्हणून देखील ओळखले गेले. आपल्या प्रांताच्या सुखसमृद्धी करता त्यांनी असंख्य कामं केलीत. अहिल्याबाई कायम अदम्य नारीशक्ती…वीरता…पराक्रम…साहस…न्याय…राजतंत्राचे एक अद्वितीय उदाहरण म्हणून युगानुयुगे आपल्या स्मरणात राहतील.