Header Ads

Loknyay Marathi

२१ व्या शतकातील पदवीधारकांसमोर अनेक आव्हाने उभी आहेत त्याला सामोरे जाण्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागतील - माजी कुलगुरु डॉ. व्ही. एम. साळोखे

२१ व्या शतकातील पदवीधारकांसमोर अनेक आव्हाने उभी आहेत त्याला सामोरे जाण्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागतील - माजी कुलगुरु डॉ. व्ही. एम. साळोखे
सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे. स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर पदवीधारकांनी नाविन्याचा शोध घेतला पाहिजे. त्याबरोबरच प्रामाणिकपणे कठोर परिश्रम घेतले पाहिजेत.एवढेच नव्हे तर आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक ठेवला पाहिजे त्याशिवाय यश प्राप्त होणार नाही, असे मतआसामच्या काजीरंगा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. व्ही. एम. साळोखे यांनी व्यक्त केले.

सांगली येथील भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय व न्यू लॉ कॉलेज, सांगली या महाविद्यालयांचा पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ आसामच्या काजीरंगा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. व्ही. एम. साळोखे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारती विद्यापीठाचे मानद संचालक मा. डॉ. एच. एम. कदम होते. कार्यक्रमास शिवाजी विद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक मा. डॉ. बी. एम. हिर्डेकर, सिनेट सदस्य मा. संजय परमणे, शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य व डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे व न्यू लॉ कॉलेजच्या प्राचार्या. डॉ. पूजा नरवाडकर इ. मान्यवर उपस्थितीत होते.

स्वागतपर भाषणात प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे म्हणाले की, भारती विद्यापीठाचे संस्थापक व कुलपती मा. डॉ. पतंगराव कदम यांनी घालून दिलेल्या आदर्शांच्या बळावर महाविद्यालयाने जी यशस्वी घोडदौड केली आहे याचा मला सार्थ अभिमान वाटतो. महाविद्यालयाने शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याचा आढावा त्यांनी आपल्या प्रस्ताविकपर भाषणात घेतला. याप्रसंगी प्राचार्या डॉ. पूजा नरवाडकर यांनी न्यू लॉ कॉलेजच्या प्रगतीची माहिती दिली.

आसामच्या काजीरंगा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. व्ही. एम. साळोखे पदवीधरांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, महाविद्यालयातून पदवी प्राप्त करून घेतलेल्या प्रत्येक पदवीधरांनी आपण ज्या समाजातून आलो त्या समाजाला विसरता कामा नये. विशेषतः आपण देशभक्तीला प्रथम प्राधान्यक्रम द्यावा त्याशिवाय खऱ्या अर्थाने देशाचा विकास होणार नाही.

मार्गदर्शनपर भाषणात प्रा. डॉ. बी. एम. हिर्डेकर म्हणाले की, बहुजन समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणणाऱ्या मा. डॉ. पतंगराव कदम यांचे कार्य दीपस्तंभासारखे आहे. देशाची गुंतवणूक कौशल्यावर अधिकाधिक झाली पाहिजे. इथून पुढच्या काळात पदवीबरोबरच  कौशल्यावर आधारित असणारे शिक्षण घेणे गरजेचे आहे. एव्हढेच नव्हे तर वेगवेगळ्या क्षेत्रात कौशल्य संपादन केले तरच स्पर्धेच्या युगात टिकू शकाल.

अध्यक्षीय भाषणात डॉ.एच.एम. कदम म्हणाले की, पुस्तकी शिक्षणाबरोबरच व्यवहारिक शिक्षण गरजेचे आहे.

याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्राचे  वितरण करण्यात आले. कार्यक्रमास महाविद्यालयातील विविध विभागाचे विभाग प्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. पाहुण्यांचा परिचय प्रा. डॉ. सौ. प्रभा पाटील यांनी करून दिला. याप्रसंगी उपस्थितांचे आभार  प्रा. प्रदीप डिकुळे, प्रा. संजीवकुमार साबळे  यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा. सौ. भारती भावीकट्टी  यांनी केले.
(Bharati Vidyapee's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)